मंडळी भारत भ्रमंतीमध्ये आज आपण पाहणार आहोत नागपूर जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे नागपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील मध्यभागी असणारा आणि विदर्भामध्ये येणारे ठिकाण असून महाराष्ट्राची उपराजधानी आहे. अठराव्या शतकाच्या सुरुवातीला नागपूर शहराची निर्मिती गौण्ड राजा बक्त्त बुलंद यांनी केली. या ठिकाणी दरवर्षी महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन घेतले जाते.Top 21 places visit to in Nagpur District
हे ठिकाण देशाच्या मध्यभागावर असल्यामुळे बरेच लोहमार्ग आणि महामार्ग नागपूर जिल्ह्यातून जातात. या जिल्ह्यात मुख्य पिके ऊस, गहू, संत्री, मूग,सोयाबीन, ज्वारी,तूर, कापूस ही पिके घेतली जातात. नागपूरला ‘संत्रा नगरी” या नावाने देखील ओळखले जाते. तसेच सध्या या शहराला स्वच्छ शहर आणि भारतातील दुसरे हिरवे शहर म्हणून नामांकन मिळाले आहे.
नागपूर जिल्ह्यातून वर्धा आणि पैनगंगा या नद्या वाहत असून कन्हान मी नागपूर मधली मुख्य नदी आहे. या जिल्ह्यात 12 तालुके आहेत. येथील लोकसंख्या अंदाजे 46 लाखाच्या आसपास आहे. तसेच या जिल्ह्यात अनेक सांस्कृतिक धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत. नागपूर जिल्ह्यात ब्रिटिश काळात 0 माईल स्टोन ची स्थापना करण्यात आली होती. तसेच या जिल्ह्यात वर्षभर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात.
नागपूर जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे-
1)पेंच व्याघ्र प्रकल्प-

Pench Tiger Reserve हा महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेलगत वसलेला एक निसर्गरम्य आणि जैवविविधतेने समृद्ध असा व्याघ्र प्रकल्प आहे. या अभयारण्यातून पेंच नदी वळणवळणाने वाहते नदीच्या नावावरून पेंच अभयारण्य हे नाव पडले. 1992 मध्ये हे अभयारण्य व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले.
हे अभयारण्य सुमारे २५७.२६ किलोमीटर क्षेत्रावर पसरले आहे. तसेच या अभयारण्यात वाघ,बेंगाल टायगर,बिबट्या,सांबर, चितळ, नीलगाय,विविध प्रकारची औषधी वनस्पती, वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांच्या जाती पहायला मिळतात.”मोगली” आणि ‘जंगल बुक’ या गोष्टीची प्रेरणा लेखक रुडयार्ड किपलिंग यांनी याच अभयारण्यातून घेतली होती. नागपूर पासून हे ठिकाण 80 किलोमीटर अंतरावर आहे.
2)सातपुडा बॉटनिकल गार्डन-

Satpuda Botanical Garden हे नागपूर जिल्ह्यातील फुटाळा तलावाजवळ असलेले निसर्गप्रेमींसाठी आणि अभ्यासकांसाठी एक सुंदर उद्यान आहे. या उद्यानात मोठ्या प्रमाणात जैवविविधता असून वेगवेगळ्या दुर्मिळ वनस्पती, वेली, फुलझाडे पाहायला मिळतात. उद्यान परिसर शांत असून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी निरीक्षणासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात. निसर्गप्रेमी,जीवशास्त्र, प्राणीशास्त्र यांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हे उद्यान अद्वितीय ठिकाण आहे.
3)दीक्षाभूमी-

Dikshabhumi हे नागपूर जिल्ह्यातील बौद्ध तीर्थक्षेत्र आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 मध्ये या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. आणि त्यांच्याबरोबर लाखो अनुयायांनाही या ठिकाणी दीक्षा देण्यात आली त्यामुळे हे ऐतिहासिक ठिकाण “दीक्षाभूमी” नावाने प्रसिद्ध झाले. या ठिकाणी असलेला स्तूप सांची येथील स्तूपासारखा असून 120 फूट उंच आहे. व भारतातील उंच स्तूपांपैकी एक आहे.
या ठिकाणी डॉ. आंबेडकर यांचा अस्थिकलश, तसेच बौद्ध धर्माच्या प्रसाराशी संबंधित छायाचित्रे आणि बुद्ध मूर्ती आहेत. दरवर्षी 14 ऑक्टोबरला”धम्मचक्र प्रवर्तन दिन’ म्हणून या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो. त्यावेळी जगातील अनेक देशातील लाखो बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीला भेट देतात.महाराष्ट्र शासनाने दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे.
4)रामटेक-

Ramtek हे नागपूर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक, धार्मिकआणि पवित्र पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी भगवान रामाचे मंदिर असून वनवास काळात रामाने या ठिकाणी विश्रांती घेतली होती म्हणून या ठिकाणाचे नाव रामटेक किंवा रामटेकडी म्हणून ओळखले जाते.
या ठिकाणी अनेक लहान मंदिरे आणि रामटेक परिसरात शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर,टोटलाडोह धरण,खिंडसी तलाव,कवी कुलगुरू कालिदास स्मारक,रामटेक मनोरंजन पार्क,,रामटेक पार्क,रामटेक किल्ला,नागर्धन किल्ला,रामटेक वन्यजीव अभयारण्य,रामटेक संग्रहालय अशी अनेक पर्यटन स्थळ रामटेक परिसरात आहेत. नागपूर पासून रामटेक हे ठिकाण पन्नास किलोमीटर अंतरावर आहे.
Please visit our website: allindiajourney.com
5)हजरत ताजुद्दिन बाबा दर्गा-

Hazrat Baba Tajuddin Dargah हे नागपूर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. हा सूफी दर्गा नागपूरच्या ताजबाग परिसरात असून सर्वधर्माचे हजारो भक्त या ठिकाणी दर्शनाला येतात.हजरत बाबा ताजुद्दीन यांचा जन्म 1861 मध्ये कँप्टी या ठिकाणी झाला. लहानपणापासूनच त्यांना अध्यात्मिक गोष्टींचे ज्ञान होते.
त्यांनी त्यांच्या जीवनात अनेक चमत्कार अनुभवले. त्यामुळे त्यांना “शहंशाह-ए-हफ्त-आकलीम” म्हणजे सात प्रदेशांचे सम्राट असे मानले जाते. भक्तांच्या कल्याणासाठी त्यांनी केलेले कार्य अनमोल आहे.या ठिकाणी बाबांचा उर्स मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
6)तेलनखेडी श्री कल्याणेश्वर शिव मंदिर-

Shree Kalyaneshwar Shiv Temple हे नागपूरमधील फुताळा तलावाच्या किनारी सिव्हिल लाईन्स परिसरात असलेले ऐतिहासिक व धार्मिक प्रसिद्ध शिव मंदिर आहे.हे मंदिर तीनशे वर्षे जुने असून मंदिराची स्थापत्यकला व येथील शांत वातावरण भक्तांना आकर्षित करते.
मंदिर परिसरात अनेक लहान मंदिरे,फुताळा तलाव, तेलनखेडी हनुमान मंदिर आणि जपानी गुलाब उद्यान यांसारखी पर्यटनस्थळे असून शिल्पकला पाहायला मिळतात. महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात या ठिकाणी पूजा व अभिषेक केले जातात. नागपूर रेल्वे स्थानकापासून हे ठिकाण पाच किलोमीटर अंतरावर आहे.
7)जामा मशिद-

Jama Mashid हे नागपूर जिल्ह्यातील इतवारी या ठिकाणी असून ऐतिहासिक व प्रेक्षणीय मशिद आहे. 19 व्या शतकात बांधलेल्या या मशिदीत इस्लामिक वास्तुकला, गोंडशैली व मुगल स्थापत्यशैली यांचा समावेश केला आहे.ही मशीद मुस्लिम बांधवांच्या नमाज पठनासाठी या मशिदीत प्रार्थना हॉल, मिनार आहेत. रमजानच्या काळात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्यक्रम आणि सामूहिक नमाज पठण केले जाते. नागपूर रेल्वे स्थानकापासून ही मशीद दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे.
8)धापेवाडा विठोबा मंदिर-

Dhapewad Vithoba Temple हे नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा गावातील चंद्रभागा नदीच्या किनारी वसलेले एक प्रसिद्ध विठ्ठल आणि रुक्मिणी यांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. धापेवाडाच्या या ठिकाणाला “विदर्भाचे पंढरपूर” म्हणून ओळखले जाते.नागपूरचे दिवाण उमाजी आबा यांनी अठराव्या शतकात या मंदिराची स्थापना केली होती.
मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी ची मूर्ती स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. आषाढी कार्तिकी एकादशीच्या वेळी या ठिकाणी मोठी यात्रा भरते. त्यावेळी महाराष्ट्रासह गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू येथून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. नागपूर पासून हे ठिकाण 30 किलोमीटर अंतरावर आहे.
9)खिंडसी तलाव-

Khindsi Lake हे नागपूर जिल्ह्यातील रामटेक पासून चार किलोमीटर अंतरावर असलेले प्रसिद्ध निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. या तलावात नौकाविहारासाठी मोटर बोट, पेडल बोट, रोविंग बोट्स, वॉटर स्कूटर्स या सुविधा उपलब्ध आहेत. तसेच तलाव परिसरात असलेल्या घनदाट जंगलात फिरण्यासाठी ट्रेकिंग सुविधाही देण्यात आलेल्या आहेत.
खिंडसी तलाव हे विदर्भातील निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणच्या परिसरात रामटेक गडमंदिर हे ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे. नागपूर पासून हे ठिकाण 53 किलोमीटर अंतरावर आहे.
10)तोतलाडोह धरण-

Totladoh Dam हे नागपूर जिल्ह्यातील रामटेक जवळील पेंच नदीवर महाराष्ट्र शासनाने 1989 मध्ये बांधलेले महत्त्वाचे गुरुत्वाकर्षण धरण आहे. या धरणाची उंची 74.5 मीटर असून लांबी 680 मीटर एवढी आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता 1241 दशलक्ष घनमीटर आहे. तसेच या धरणावर 160 मेगावॅटएवढी वीज निर्मिती केली जाते. नागपूर शहराला 70 टक्के पिण्याच्या पाण्याचा पुरवठा या धरणातून केला जातो.
आणि शेतीच्या सिंचनासाठी या धरणातील पाण्याचा वापर केला जातो. तोतलाडोह धरण हे पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीत येते,धरण परिसर निसर्ग सौंदर्याने बहरलेला असून या ठिकाणी पेंच राष्ट्रीय उद्यान, अंबाखोरी धबधबा आणि रामटेक येथील ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत. नागपूर शहरापासून हे ठिकाण 80 किलोमीटर अंतरावर आहे.
11)गांधीसागर तलाव-

Gandhisagar Lake हा नागपूर जिल्ह्यातील मध्यभागी असलेला महाल भागातील रमण विज्ञान केंद्राजवळ आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या नागपूरमधील हा तलाव अत्यंत महत्त्वाचा आहे. हा तलाव 275 वर्षांपूर्वीचा असून या तलावाची निर्मिती त्या वेळचे शासक चांद सुलतान यांनी केली होती.
या तलावाला “शुक्रवारी तलाव” किंवा “जुम्मा तलाव” म्हणून ही ओळखले जाते. नाग नदीवर बांधलेला हा तलाव नागपूर शहराला पाणीपुरवठा करण्याच्या हेतूने बांधला होता. या तलावाच्या मध्यभागावर छोटे बेट असून त्यावर शिवमंदिर आणि बाग आहे. रात्रीच्या वेळी पिवळ्या मर्क्युरी दिव्यांच्या प्रकाशात या तलावाचे सौंदर्य खुलून दिसते.
12) बालाजी देवस्थान –

Sri Balaji and Sri Kartikeya Temple हे नागपूर जिल्ह्यातील सेमिनरी हिल्स या भागात असलेले धार्मिक आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. मी मंदिर दुमजली असून या मंदिरात खालच्या मजल्यावर श्री बालाजीची सहा फूट उंच मूर्ती आहे.आणि वरच्या मजल्यावर कार्तिकेय यांच्या मूर्ती आहेत. हे मंदिर दक्षिण भारतीय शैलीत बांधलेले असून मंदिराचे प्रवेशद्वार 60 फूट उंच आहे. या मंदिरामध्ये स्कंद षष्ठी, संकष्ट चतुर्थी, एकादशी, आणि चित्तपूर्णिमा यावेळी पूजा, अभिषेक आणि धार्मिक कार्यक्रम केले जातात.
13)ड्रॅगन पॅलेस बौद्ध मंदिर-

Dragon Palace Buddhist Temple हे नागपूर जिल्ह्यातील गौतम नगर, कंम्पटी या भागात असलेले एक अनोखे आणि आकर्षक बौद्ध धार्मिक मंदिर आहे. या मंदिराची स्थापना 1999 मध्ये झाली असून मंदिराचे उद्घाटन जपानच्या निक्की काटो यांच्या हस्ते करण्यात आले होते. जपान आणि भारतीय संस्कृतीचे मिश्रण असलेली या मंदिराची वास्तुशैली असून मंदिरामध्ये एकाच सागवानी लाकडातून कोरलेली भगवान बुद्धांची 18 फूट उंचीची मूर्ती आहे.
हे मंदिर भारत आणि जपानच्या मैत्रीचे प्रतीक मानले जाते. मंदिर परिसरात फुलबाग ध्यानकक्ष, वाचनालय आणि शांततापूर्ण वातावरण आहे. या मंदिरात दररोज “नम म्योहो रेन्गे क्यो” हा जप केला जातो. देशभरातून या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देतात. नागपूर पासून हे ठिकाण 20 किलोमीटर अंतरावर आहे.
14) खेकरा नाला धरण-

Khekra Nala Dam हे मातीचे बांधलेले धरण नागपूर जिल्ह्यातील छिंदवाडा मार्गावरील खापा गावाजवळ आहे.या ठिकाणी असलेले शांत तलाव, हिरवीगार वनराई आणि निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना आकर्षित करतो. या धरणाचे बांधकाम 1988 मध्ये पूर्ण झाले. धरणाची उंची 24.5 मीटर तर लांबी 330 मीटर एवढी आहे.
या धरणातील पाण्याचा वापर शेतीच्या सिंचनासाठी केला जातो. धरण परिसरात ट्रेकिंग, जलक्रीडा अशा सुविधा उपलब्ध आहेत. धरण परिसर घनदाट जंगलाचा असून या ठिकाणी तलाव आहे. नागपूर पासून हे ठिकाण 65 किलोमीटर अंतरावर आहे.
15) भारताचा शून्य मैलाचा दगड –

Zero Mile Stone हा भारताच्या इतिहासातील भौगोलिक आणि ऐतिहासिक स्मारक आहे.हा दगड सॅंडस्टोनपासून बनवलेला असून या दगडा शेजारी घोड्यांची चार शिल्पे आहेत. हा दगड 1907 मध्ये ब्रिटिशांनी “ग्रेट ट्रिगोनोमेट्रिकल सर्व्हे ऑफ इंडिया” दरम्यान निर्माण केला होता.
नागपूर या ठिकाणाला भारताचा मध्यबिंदू मानून या दगडाचा वापर देशातील विविध ठिकाणचे अंतर मोजण्यासाठी केला जात असे.तसेच येथील दगडाच्या पायथ्याशी विविध शहरांपर्यंतचे अंतर मैलांमध्ये कोरलेले आहे, जसे की हैदराबाद 318 मैल, जबलपूर 170 मैल इत्यादी नागपूर मधील “शून्य मैलाचा दगड” पाहिल्यानंतर भारताच्या भौगोलिक आणि ऐतिहासिक वारशाची झलक पहायला मिळते.
16) अंबाझरी तलाव –

Ambazari Lake हा नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी या ठिकाणी 1870 मध्ये ब्रिटिश कालखंडात बांधलेला प्राचीन व सुंदर तलाव आहे. हा तलाव त्यावेळी शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी बांधला होता. हा तलाव नाग नदीचे उगम स्थान असून तलाव परिसर दाट झाडीने आणि हिरवाईने नटलेला आहे.
तसेच या तलावाजवळ एक उद्यान असून लहान मुलांसाठी खेळणी व चालण्यासाठी ट्रॅक आहे. तसेच पक्षी निरीक्षण आणि छायाचित्रणासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.नागपूर पासून हे ठिकाण सात किलोमीटर अंतरावर आहे.
17) महाकवी कालिदास स्मारक-

Mahakavi Kalidas Smarak हे नागपूर जिल्ह्यातील रामटेक या ठिकाणी असलेले महाकवी कालिदास यांच्या सन्मानार्थ बांधलेले प्रसिद्ध स्मारक आहे. कवी कालिदास यांनी ‘मेघदूत’ हे प्रसिद्ध महाकाव्य या ठिकाणी सरचले होते. या स्मारकाचे उद्घाटन 12 डिसेंबर 1973 मध्ये करण्यात आले होते.
येथील स्मारकात कवी कालिदास यांच्या ‘मेघदूत’, ‘रघुवंश’, ‘मालविकाग्निमित्र’, ‘विक्रमोर्वशीय’, ‘कुमारसंभव’ आणि ‘शाकुंतल’ या साहित्यकृतींतील विविध प्रसंगांवरील आधारित तैलचित्रे देशातील नामवंत चित्रकारांनी रेखाटली आहेत. या स्मारक परिसरात उद्यान, पाण्याचे कारंजे आणि शांत वातावरण आहे. साहित्यप्रेमी आणि इतिहास प्रेमींसाठी हे स्मारक उत्तम ठिकाण आहे.नागपूर पासून हे ठिकाण 50 किलोमीटर अंतरावर आहे.
18) भिवगड किल्ला

Bhivgad Fort हा नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात असलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे. या किल्ल्याला ‘भिवसेन कुआरा’ किल्ला म्हणूनही ओळखले जाते. हा किल्ला परिसर निसर्गरम्य, शांततापूर्ण आणि घनदाट जंगलांनी वेढलेला असून पेंच नदीवरच्या धरणाच्या मागच्या बाजूला उंच टेकडीवर आहे.
या किल्ल्याच्या पायथ्याशी अर्धवट बुडालेला दोन मजली महाल आहे ज्याला “राणी महाल” म्हणून ओळखले जाते. किल्ल्यावर दगडात बांधलेले बुरूज आणि तटबंदी आहे. विदर्भातील लपलेलं रत्न अशी या किल्ल्याची ओळख आहे.भिवगड किल्ला हा ट्रेकिंग प्रेमी आणि इतिहास प्रेमींसाठी उत्तम ठिकाण आहे. नागपूर पासून हा किल्ला 46 किलोमीटर अंतरावर आहे.
19) सिताबर्डी किल्ला-

Sitaburdi Fort हा नागपूर जिल्ह्यातील नागपूर शहराच्या मध्यावर आणि दोन टेकड्यांवर असलेला ऐतिहासिक किल्ला आहे. या ठिकाणी 1817 मध्ये नागपूरचे भोसले आणि ब्रिटिश यांच्यात लढाई झाली होती. त्यावेळी ब्रिटिशांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि त्याचा उपयोग लष्करी कामासाठी केला. तसेच 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झालेल्या नवाब कादर अली आणि त्यांच्या आठ सहकाऱ्यांना या ठिकाणी फाशी देण्यात आली होती.
त्यांच्या स्मरणार्थ या किल्ल्यात एक स्मारक उभारण्यात आले आहे. हा किल्ला भारतीय लष्कराच्या ताब्यात असल्यामुळे वर्षातून 26 जानेवारी,1 मे आणि 15 ऑगस्ट यावेळी सर्वसामान्यांसाठी खुला असतो. तसेच किल्ल्याच्या आत मध्ये सिताबर्डीच्या लढाईत शहीद झालेल्या सैनिकांचे युद्ध स्मारक आहे.या किल्ल्याच्या परिसरात टेकडी गणेश मंदिर,कस्तुरचंद पार्क,एम्प्रेस मॉल,रमण सायन्स सेंटर हे पर्यटन स्थळे आहेत. तसेच किल्ला परिसरात प्राचीन तोफा आणि लष्करी वस्तू पाहायला भेटतात.
20)अदासा गणपती मंदिर-

Adasa Ganpati Temple नागपूर जिल्ह्यातील कालमेश्वर तालुक्यातील अदासा गावामधील छोट्या टेकडीवर असलेले प्राचीन व धार्मिक स्थळ आहे. विदर्भातील अष्टविनायकापैकी हे एक ठिकाण आहे. या ठिकाणी एकाच दगडातून कोरलेली भगवान श्री गणेशाची 11 फूट उंचीची एकाश्म मूर्ती आहे.
हे मंदिर 10 हेक्टर क्षेत्रफळात पसरलेले असून या ठिकाणी भगवान शिव, हनुमान, काली माता आणि नागदेवता आणि इतर मिळून 20 लहान मंदिरे आहेत. हे गणपती मंदिर भक्तांसाठी एक शांत, आध्यात्मिक आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. नागपूर पासून हे ठिकाण 43 किलोमीटर अंतरावर आहे.
21)श्री शांतीनाथ जैन मंदिर-

Shree 1008 Shantinath Jain Temple हे नागपूर जिल्ह्यातील अत्यंत प्रसिद्ध जैन धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. उत्तर भारतीय स्थापत्य शैलीत बांधलेले हे मंदिर अकराव्या ते बाराव्या शतकात बांधले गेले. हे मंदिर 16 वे तीर्थकार भगवान शांतिनाथ यांना समर्पित आहे. हे मंदिर रामटेक किल्ल्याजवळ असून पिवळ्या दगडामध्ये कोरलेले आहे. मंदिरात श्री भगवान शांतिनाथ यांची 13 फूट 5 इंच उंच असलेली उभी मूर्ती आहे.
या मंदिर परिसरात नऊ मंदिरे असून चतुर्विंशती जिनालय आणि पंच बाल्यती जिनालय हे संत शिरोमणी आचार्य विद्यासागरजी यांच्या मार्गदर्शनाखाली बांधण्यात आले आहेत. दरवर्षी कार्तिक सुदी ला या ठिकाणी रथयात्रा व विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या ठिकाणी धर्मशाळा आणि भोजनालयाची सुविधा आहे. नागपूर पासून हे ठिकाण 45 किलोमीटर अंतरावर आहे.
visit the travel blog:https://theworldtravelguy.com/
1)श्री 1008 शांतीनाथ जैन मंदिर हे नागपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहे?
श्री 1008 शांतीनाथ जैन मंदिर हे नागपूर जिल्ह्यातील रामटेक या ठिकाणी आहे.
2)तोतलाडोह धरण हे नागपूर जिल्ह्यातील कोणत्या नदीवर बांधले आहे?
तोतलाडोह धरण हे नागपूर जिल्ह्यातील पेंच नदीवर बांधले आहे.
3)सातपुडा बॉटनिकल गार्डन हे नागपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहे?
सातपुडा बॉटनिकल गार्डन हे नागपूर जिल्ह्यातील फुटाळा तलावाजवळ आहे.